शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

भारतीय संस्कृती व आयुर्वेद

भारतीय संस्कृती व आयुर्वेद
स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग
पुणे 11.2.2001

सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विषयाचे प्रयोजन काय ? पण जर थोडा सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येईल आयुर्वेद हे केवळ एक वैद्यकशास्त्र नाही तर ती भारतीय संस्कृतीच्या वाटचालीत उत्पन्न झालेली व विकसित झालेली जीवनपद्धती आहे, व म्हणून भारतीय संस्कृतीशी त्याचे नाते अतूट आहे. त्यामुळेच आयुर्वेदाच्या अभ्यासकाला भारतीय संस्कृतिचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
अभ्यासवर्गाची रचना आपल्या संघटनेचे प्रयोजन समजून घेण्यासाठी असते. त्यासंदर्भात विचार करतांना आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की व्यासपीठ हे केवळ आयुर्वेदीय संघटन नाही, तर भारतीय सांस्कृतिक वारशाच्या आधारावर नव्या भारताची उभारणी करण्याचे ते माध्यम आहे. त्यादृष्टीने हा वारसा समजून घेण्याची गरज आहे.
भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरची सर्वात प्राचीन संस्कृती आहे. अगदी टिकाकारांनी सुद्धा भारतीय संस्कृती ही किमान पाच हजार वर्षे प्राचीन असल्याचे मान्य केले आहे. डार्विनच्या सिद्धांतानुसार ‘जगण्याच्या संघर्षात’ (In the struggle for existence) जो सगळ्यात जास्त सक्षम असतो तोच टिकतो (Survival of the fittest). या न्यायाने काळाच्या ओघात सगळ्यात जास्त सक्षम असल्यामुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. एखादी संस्कृती जेंव्हा हजारो वर्ष टिकून राहाते तेंव्हा जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या सर्व समस्यांना उत्तरे शोधल्याशिवाय व अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, नगररचना, संपर्कसाधने अशा सर्व भौतिक विज्ञानात किमान प्रगती केल्याशिवाय ती टिकूच शकत नाही. ज्या अर्थी किमान पाच हजार वर्षे भारतीय संस्कृती टिकून आहे त्या अर्थी या संस्कृतीत जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या सर्व समस्यांना उत्तरे शोधण्याचा व सर्व भौतिक विज्ञानात किमान प्रगती करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्या गेला होता यात शंका असण्याचे कारण नाही. या प्रदीर्घ कालावधीत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या सर्व संभाव्य समस्या (All permutations and combinations of all sorts of problems in every walk of life) उत्पन्न झाल्या असणारच व त्यांना त्या त्या काळात त्यांचे योग्य त्या पद्धतीने निराकरण झाले असणारच. कारण जी संस्कृती समस्यांचे असे निराकरण करू शकत नाही, ती काळाच्या ओघात नष्ट होते हा जगाचा इतिहास आहे.
त्यामुळे आरोग्याच्या क्षेत्रातही हजारो वर्षांच्या कालावधीत सर्व प्रकारचे मानस शारीर आजार, सर्व प्रकारचे संक्रामक रोग, अपघातजन्य गंभीर अवस्था, अशा सर्व समस्या उत्पन्न झाल्या असणारच, ज्यांची उत्तरे शोधल्याशिवाय मानवी जीवनातले सातत्य टिकून राहूच शकत नाही. कालौघात निर्माण होणार्‍या सर्व समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता हे आयुर्वेदाचे अंगभूत सामर्थ्य आहे. व याच सामर्थ्याच्या बळावर आजही एक प्रभावी वैद्यकशास्त्र म्हणून ते टिकून आहे, नव्हे वैद्यांच्या नव्या पिढीच्या कर्तृत्वामुळे त्याला नवी झळाळी प्राप्त होते आहे.
भारतीय संस्कृतीची ही वैशिष्ठ्ये असली तरीही संस्कृतिच्या आजवरच्या वाटचालीत उत्थानपतनाचे अनेक चढउतार आले हे विसरता येणार नाही. ही महान संस्कृती ज्या देशात विकसित झाली तो देश शेकडो वर्षे पारतंत्र्यात होता हे विसरता येणार नाही, आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके उलटून गेल्यावरही हा देश आणि समाज अनेकानेक समस्यांनी ग्रस्त आहे हे नाकारता येणार नाही. देशावरचे आर्थिक संकट मोठे आहे, देशावर असलेल्या कर्जाचे व्याजच पंच्याहत्तरहजार कोटी रुपये आहे. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभावर आतंकवादी हल्ल्याची टांगती तलवार असतेच. भाषा, प्रांत, जाती, पक्ष यांचा असहिष्णू अभिनिवेश समाजात परस्पर संघर्षाचे वणवे पेटवतो. चंगळवादाचे वाढते आक्रमण समाजाला ग्रासते आहे.
तरीही अशा सगळ्या संकटांना भूतकाळात यशस्वीपणे तोंड दिले असल्याने जगातल्या विचारवंतांना आजही भारत आशेचा एकमात्र किरण वाटतो. 1986 मध्ये मास्कोत भारत महोत्सवाचे उदघाटन करतांना मिखाईल गॉर्बाचेव्ह यांनी भाषणाची सुरूवात गीतेतल्या दुसर्या अध्यायातल्या
ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषूपजायते!
संगात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोभिजायते!! 62
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम:!
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति!! 63
या श्लोकांनी केली व गीतेचे तत्वज्ञानच जगाला मार्ग दाखवू शकते असे सांगितले. इंग्लंडच्या पंतप्रधान असलेल्या मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडमधील विराट हिंदू संमेलनात बोलतांना कुटुंब संस्थेसारख्या अनेक गोष्टी जगाने भारतीय संस्कृतीकडून शिकण्यासारख्या आहेत असे सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला 27 वर्षांच्या प्रदीर्घ बंदीवासातून सुटल्यावर सर्वप्रथम भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त करतात. अटलजी पंतप्रधान झाल्यावर फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिरॅक यांनी आगामी काळात भारत महासत्ता होईल असे भाकीत केले. चीनचे राजदूत चाउ गांग यांनी पुण्यात बोलतांना भारत चीन संबंध सुधारण्यावर भर दिला व आपण एकमेकांचे उपयुक्त, विश्वासार्ह सहनिवासी आहोत असे प्रतिपादन केले. इंडोनेशिया या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अब्दुल वाहीद यांनी निवडून आल्यानंतर अग्रक्रमाने भारताला भेट दिली व भारताबरोबरचे संबंध दृढ करण्याची इछा व्यक्त केली. अटलजी पंतप्रधान झाल्यावर अमेरिकन संसदेत भारतीय लोकशाहीच्या स्वागताचा ठराव 396/4 मतांनी संमत करण्यात आला. भारतावर आर्थिक निर्बंध लादण्यात अमेरिकेची चूक झाली हे मान्य करण्यात आले व अमेरिकन अध्यक्षांना भारताबरोबर सहकार्य वाढवण्याची विनंती करण्यात आली. जपानने इतिहासात प्रथमच भारतीय तंत्रज्ञांना जपानमध्ये प्रवेश देण्यासाठी Multiple entry visa च्या नियमात बदल केले.
हे बदल होण्यामागे जसे भारतीय तत्वज्ञान व संस्कृतीची पार्श्वभूमी आहे तसेच भारताच्या बदलत्या स्वरूपाची वाढती जाणीव हेही एक कारण आहे. भारताच्या निर्यातीत 66% वाढ झाली आहे व पुढच्या वर्षीचे उद्दिष्ट 400 दशलक्ष डॉलर्सचे ठेवण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला भारताचा वाटा दिवसेंदिवस वाढतो आहे. अर्थतज्ञांचे भाकीत असे आहे की अमेरिका आज 1929 सारख्याच भीषण मंदीच्या उंबरठ्यावर उभी आहे, व या मंदीत अमेरिकन अर्थसत्ता कोसळली तर भारत अमेरिकेची जागा घेऊ शकतो. याचे कारण असे आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची काही बलस्थाने आहेत.
1. भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक बाजारपेठेशी संबंध कमी आहे.
2. भारतात विदेशी निवेश कमी आहे.
3. भारताच्या एकूण व्यापारात सरकारचे स्थान मर्यादित आहे.
4. भारतातील सुदृढ व्यापारी वर्ग.
संरक्षण सिद्धतेत भारत आज जागतिक दर्जा गाठतो आहे. संरक्षण सिद्धतेत भारत आज जागतिक दर्जा गाठतो आहे. भारतीय संरक्षण दलात समाविष्ट झालेली त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग सारखी अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रे स्वसंरक्षण व आक्रमकांवर प्रत्याघात करण्यासाठी सज्ज आहेत. कारगिलच्या युद्धाने हे सिद्ध केले आहे की भारतीय सैनिक हा जगातला प्रथम श्रेणीचा सैनिक आहे. भारताचा अंतरिक्ष संशोधन विभाग आज चंद्रकक्षेत प्रवेश करण्याची तयारी करतो आहे. भारतातल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या साखळीमुळे वैज्ञानिकांच्या संख्येत भारत आज जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. अतिप्रगत संगणक निर्मितीत अनुराग, अनुपम, परम व परम दशसहस्त्र सारख्या अतिप्रगत संगणकांनी आंतर्राष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजवली आहे. या प्रगतीमुळेच मा. अब्दुल कलामांसारखे द्रष्टे शास्त्रज्ञ देशासमोर ‘Vision 2020’ मांडत आहेत. उद्योगपती श्री. फिरोदिया यांनी विदेशातल्या भारतियांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चीनची प्रगती होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे विदेशातल्या चिनी उद्योगपतींनी चीनमध्ये केलेली मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक आहे.
तीन तीन पिके घेता येण्यासारखी सुपिक व विस्तीर्ण जमीन जगात फक्त भारताजवळच आहे, ज्यामुळे भारत जगाचे अन्नाचे कोठार बनू शकतो. सर्व प्रकारच्या अपारंपारिक उर्जा स्रोतांचे भारत हे कोठार आहे. अभियांत्रीकीतील व श्रमशक्तीतील मनुष्यबळाच्या बाबतीत भारताचा हात कोणीही धरू शकत नाही. या सगळ्या बाबींमुळेच American intelligence community ने आपल्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की भारत, रशिया व चीन येणार्यात काळात पश्चिमेचा प्रभाव घटवणार आहेत.
भारताबाहेरील भारतीय वंशाचे लोक आपला प्रभाव दखवत आहेत. मॉरीशस, त्रिनिदाद, फिजी, गयाना व सिंगापूरचे राष्ट्रप्रमुख भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेतले 38% डॉक्टर्स, 12% शास्त्रज्ञ, नासामध्ये 36%, मायक्रोसॉफ्टमध्ये 34%, आयबीएममध्ये 28%, इंटेलमध्ये 17% व झेरॉक्समध्ये 13% भारतीय आहेत. लुंबिनीला झालेल्या विश्व बौद्ध संमेलनात भंते ज्ञानजगत व शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींच्या नेतृत्वात जगातल्या 16 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, जे आजही बौद्ध तत्वज्ञानाचे उगमस्थान म्हणून भारताला वंद्य मानतात. योग, स्वाध्याय, विपश्यना, स्वामीनारायण, इस्कॉन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, महर्षी महेश योगी या सर्वांना जगभर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आयुर्वेदाच्याही बाबतीत हे घडते आहे. या सांस्कृतिक दिग्विजयातून हळूहळू एका नव्या विश्वसंस्कृतीची उभारणी होते आहे. विश्व इतिहासाचे प्रख्यात भाष्यकार अर्नॉल्ड टॉयन्बी यांच्या द्रष्ट्या शब्दांची प्रचिती या सर्व घटनांमधून येते आहे. त्यांचे शब्द आहेत “मानवी इतिहासाच्या या अत्यंत भयंकर क्षणी मानवजातीसाठी मुक्तीचा एकमेव मार्ग हा भारतीय मार्ग आहे.” (At this supremely dangerous moment of human history, the only way of salvation for mankind is an Indian way.) जगातल्या सगळ्या विविधतांना सामावून घेणारे भारतीय जीवन दर्शन आहे. न्या. रानडे म्हणाले होते, ‘This land is a land of promises.’ एकेकाळी अमेरिकन तरुणांना उद्देशून Pearls Buck या लेखिकेने आपल्या Good earth या कादंबरीत असे म्हटले होते, “Its we, who are going to write the history of centuries to come” आज जर कोणाला हे म्हणायचा अधिकार व क्षमता असेल तर ती भारतीय तरुणांनाच आहे, या दुर्दम्य आत्मविश्वासाने व अभेद्य निश्चयाने काम करण्याची गरज आहे.
या संदर्भातली स्त्री वैद्यांची भूमिका महत्वाची आहे. विवाहाबद्दल एकाने असे म्हटले होते की ‘Marriage is not a word, it’s a sentence, a life sentence’ पण यातुनही कौशल्याने मार्ग काढण्याची क्षमता स्त्रियांच्यात असते. म्हणूनच स्त्रियांबद्दल एकाने म्हटले आहे ‘Women the fair magicians, who can turn men into donkeys and make them feel they are lions’ या क्षमतेचा वापर करून आपण कुटुंबाला व समाजालाही आयुर्वेदानुकुल बनवू शकता. काम करतांना अडचणी येणारच पण त्या बाजुला सारल्या पाहिजे. रात्री एका माणसाला नदी ओलांडून पलिकडे जायचे होते, तो नावेत बसला व त्याने नाव वल्हवायला सुरूवात केली, वल्हवता वल्हवता पहाट झाली व त्याच्या असे लक्षात आले की नाव रात्री जिथे होती तिथेच होती, कारण नाव ज्या दोरीने किनार्याावरच्या झाडाला बांधलेली होती, ती दोरी सोडायचा तो विसरला होता. आपणही आपल्याला बांधून ठेवणार्याव दोर्‍या सोडल्या तर व्यासपिठाची नाव आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत निश्चितच घेवून जाऊ.
अभ्यासवर्ग म्हणजे लक्ष्याच्या दिशेने प्रत्यंचा ताणलेले धनुष्य आहे, धनुष्यातून सुटणारा बाण म्हणजे आपण कार्यकर्ते आहोत. धनुष्यातून सुटलेला बाण मध्ये कुठेही न थांबता लक्ष्याचा वेध घेतो तद्वतच मध्ये न थांबता आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्याला काम करायचे आहे. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात “Arise, awake and stop not till the goal is reached.”
****

शनिवार, १७ डिसेंबर, २०११

कार्यकर्त्याचा विकास

कार्यकर्त्याचा विकास
आयुर्वेद व्यासपीठ अभ्यासवर्ग
सांगली 27.5.01

आधीच्या सत्रांमध्ये विविध जिल्ह्यातील कार्यवृत्त आपण ऐकले, त्यातून व्यासपिठाच्या विविध उपक्रमांची व संघटनेच्या विस्ताराची कल्पना आपल्याला आली असेल. शास्त्रचर्चेच्या सत्रातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असतील. व्यासपिठाच्या सर्व उपक्रमांमध्ये अभ्यासवर्गाचे स्थान वैशिष्ठ्यपूर्ण आहे. अन्य उपक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांची योजना आपण करतो. पण संघटना ज्या विचारांवर अधिष्ठीत आहे, त्या विचारप्रणालीचा व ही विचारप्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी स्विकारलेल्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासवर्गात होते.
पुष्कळदा कार्यक्रमांच्या घाइगर्दीत ज्या उद्दिष्टांसाठी काम करतो आहोत, त्यांचा विचार करायला वेळ मिळत नाही व मग कार्यक्रम भरपूर व प्रभावी झाले तरी काम दिशाहीन होते. कधीकधी उद्दिष्टांचा, ध्येयधोरणांचा विचार खूप होतो, पण त्या प्रक्रियेत कामाची गती मंदावते. संघटनेचे काम व्यवस्थित चालण्यासाठी दिशा आणि गती दोन्हीत संतुलन आवश्यक आहे.
अभ्यासवर्गात आपण आपल्या संघटनेच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, ध्येयधोरणे व कार्यपद्धती समजाऊन घेतो, त्याची उजळणी करतो. उजळणी साठी इंग्रजीत Revision शब्द आहे, एकाने त्याचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे; Revision gives you a new vision आपल्या संस्कृतीत पारायण शब्द आहे, त्यामागे हाच दृष्टीकोन आहे.
संघटनेच्या कामाचा आधार असतो कार्यकर्ता, संघटनेची चेतनाशक्ती असतो कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या क्षमतेनुसार, कल्पकतेनुसार काम उभे राहाते, अर्थात कार्यकर्त्याच्या क्षमता व कल्पकते सारखेच त्याच्या मर्यादांचे व गुणदोषांचेही परिणाम कामात उमटतात. विवेकानंद शीलास्मारक व केंद्राचे शिल्पकार मा. एकनाथजी रानडे असे म्हणत असत की कार्यकर्त्याकडे पाहिले की कार्यक्षेत्रातल्या त्याच्या कामाची कल्पना करता येऊ शकते व एखाद्या कार्यक्षेत्रातले काम बघितले की त्यावरून कार्यकर्त्याची कल्पना करता येऊ शकते. कार्यकर्ता हा त्याच्या कार्यक्षेत्रापुरता त्या संघटनेचे प्रतीक असतो, साकार रूप असतो. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्याच्या व्यवहारानुसार, गुणवत्तेनुसार स्थानिक लोकांच्या संघटनेविषयी धारणा तयार होतात. कम्युनिस्ट रशियाचा पहिला राष्ट्रप्रमुख लेनिन याला अशी सवय होती की देशातला सामान्य कामगार, शेतकर्या.ला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी तो अचानक एखाद्या सामान्य कामगार, शेतकर्यारच्या झोपडीत जाऊन त्याच्याशी गप्पा मारायचा. एकदा अशाच गप्पा झाल्यावर तो शेतकरी त्याला म्हणाला ‘काय गंमत आहे पाहा, तुमचे नाव लेनिन आहे आणि देशाच्या प्रमुखाचे नावही लेनिन आहे. तो तुमच्याइतका चांगला असता तर किती बर झाल असत ?’
म्हणून संघटनेच्या उपक्रमात कार्यकर्त्याचा विकास हा महत्वाचा भाग असतो. विकासाचा उपक्रम म्हणून काही स्वतंत्र उपक्रम नसतो, तर छोट्यामोठ्या कार्यक्रमातून, बैठकांमधून, अभ्यासवर्गातून व सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनौपचारिक गप्पा, चर्चा व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासातून ही विकासाची जडणघडण होत असते. पण एक कार्यकर्ता म्हणून आपणही यासाठी सातत्याने व सक्रीय प्रयत्न करायला हवे. ज्याप्रमाणे व्यक्तिगत जीवनात एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंबप्रमुख म्हणून, एक वैद्य म्हणून आपली प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा अशी महत्वाकांक्षा ठेवतो, त्यासाठी धडपड करतो, कष्ट करतो, जे अगदी स्वाभाविक व उचितच आहे, त्याचप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणूनही माझी प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे यासाठी पण धडपड, कष्ट केले पाहिजे. आपली क्षमता, गुणवत्ता व कार्यकुशलता वाढली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे.
संघटनेचे काम करतांना सगळ्यात पहिले उद्दिष्ट म्हणजे संघटना अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवणे. हे पोहोचवण्याचे काम होते संपर्कातून, भेटीगाठीतून. या भेटीगाठींमुळे नव्यानव्या व्यक्ती संघटनेशी जोडल्या जातात, त्यातून शक्तीसंचय होतो. हा शक्तीसंचय अंकगणिताप्रमाणे Arithmetic progression(5+5=10) न होता भूमितीय पद्धतीने Geometric progression (5x5=25) होतो. या संपर्काचा आधार आत्मियता असला पाहिजे.
To meet is to know
To know is to understand
And to understand is to love
म्हणून भेटीगाठींसाठी वेळ दिला पाहिजे. त्यातही या भेटीगाठी प्रत्येकवेळा कामासाठी, कामापुरत्या नको. सहज, अनौपचारिक भेटीतून जे संबंध निर्माण होतात ते अधिक मजबूत असतात.
संपर्कातून, नव्यानव्या व्यक्ती संघटनेशी जोडल्या जातात, पण संघटनेशी त्यांचे नाते जडते ते संस्कारांमुळे. असे संस्कार भाषणाने होत नाहीत, ते होतात व्यवहारातल्या प्रत्यक्ष अनुभवाने, कार्यकर्त्यांच्या वागण्याने. केरळमध्ये संघाचे काम प्रभावी होत होते, त्यामुळे कम्युनिस्ट अस्वस्थ झाले, त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला संघाच्या कामाचे रहस्य शोधून काढण्यासाठी शाखेत जायला सांगितले. वेळोवेळी ते त्याला त्याबद्दल विचारत, त्याला काहीच सांगता येत नसे, होताहोता त्याचा साम्यवादावरचा विश्वास उडाला व संघातील अनौपचारिक, आत्मियतापूर्ण वातावरणामुळे तो संघाशी जोडल्या गेला व संघाचा प्रचारक झाला.
संघटनेच्या निकोप वाढीसाठी ते काम कार्यकर्त्यांच्या संचाच्या प्रयत्नातून Teamwork उभे राहाणे आवश्यक असते. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नंतर एका भेटीत भारतीय अंतरिक्ष विज्ञानाचे प्रवर्तक श्री विक्रम साराभाईंनी त्याला त्याच्या यशाचे रहस्य विचारले. त्याने उत्तर दिले की चंद्रावर पाय ठेवणारा मी एकटा असलो तरी त्याच्या पाठीमागे पृथ्वीवर काम करणार्याा हजारो लोकांचे नियोजनबद्ध, मन:पूर्वक व अचुक सामुहिक परिश्रम होते.
सामुहिक प्रयत्नांइतकेच महत्व वाट्याला येईल ते काम आनंदाने स्विकारण्याला व मन:पूर्वक पार पाडण्याला आहे. संघटनेने सोपवलेले कुठलेही काम छोटे किंवा हलके न मानता ते तितक्याच तळमळीने करणे आवश्यक असते. 1916 च्या हिवाळ्यात कॉंग्रेसचे अधिवेशन लखनौला होते, लखनौला त्यावेळी कडाक्याची थंडी होती. पहाटे बाहेर गावाहून येणार्यास प्रतिनिधींना असे दिसले की कोणीतरी चुलीवर पाणी गरम करतो आहे, जवळ गेल्यावर लक्षात आले की ते लोकमान्य टिळक होते. बाहेरून येणार्याी माझ्या कार्यकर्त्यांना लखनौच्या थंडीची सवय नाही, त्यांच्यासाठी गरम पाणी आवश्यक आहे, ही तळमळ त्यामागे होती. राजसूय यज्ञात महाराज युधिष्ठीर कामे वाटून देत असतांना भगवान श्रीकृष्णांनी स्वत:कडे उष्ट्या पत्रावळी गोळा करण्याचे काम घेतले होते.
कार्यकर्त्याच्या विकासात अनुशासनालाही फार महत्व आहे. एका पंक्तीमध्ये संघाचे सरसंघचालक श्रीगुरूजीही भोजनासाठी बसले होते, व्यवस्थेमध्ये असलेल्या कार्यकर्त्याला वाटले की भोजन संपल्यावर सगळे एकदमच उठले तर श्रीगुरूजींना बाहेर पडायला अडचण होईल, म्हणून त्याने सूचना दिली की कोणीही स्वयंसेवक जागेवरून उठणार नाही व श्रीगुरूजींना उठण्यासाठी विनंती केली. श्रीगुरूजी त्याला म्हणाले ‘अरे मी पण एक स्वयंसेवक आहे, तूच सूचना दिली आहेस की ‘कोणीही स्वयंसेवक जागेवरून उठणार नाही’, मी पण जागेवरून उठणार नाही’, व्यवस्थेतल्या कार्यकर्त्याला आपली चूक लक्षात आली, त्याने सूचना दिली की सगळे उठू शकतात. संघाच्या सर्वोच्च पदावर असूनही ‘मी एक स्वयंसेवक आहे, व स्वयंसेवकासाठी असणारे नियम मलाही लागू आहेत’ ही श्रीगुरूजींची धारणा होती.
कार्यकर्त्यावर सोपवलेले काम नीट पार पाडता येण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या कामातली कुशलता आत्मसात करावी लागते. एखाद्या कामाचे, कार्यक्रमाचे नियोजन करणे, पूर्वतयारी करणे, प्रत्यक्ष कार्यक्रमाचे संचालन करणे, पाठपुरावा करणे अशी विविध प्रकारची कामे करण्यासाठी अभ्यास व अनुभवातून कौशल्य संपादन करावे लागते. त्यासाठी जागरुक राहून प्रयत्न करावे लागतात. अ. भा. विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. यशवंतराव केळकर एका कार्यक्रमात बोलत असतांना श्रोत्यांमध्ये बसलेले जेष्ठ पत्रकार श्री. पा.वा. गाडगीळ टिपण काढत होते. नंतर यशवंतराव त्यांना म्हणाले ‘माझ्या व्याख्यानाची टिपणे कशासाठी’? त्यावर पा.वा. गाडगीळ म्हणाले ‘प्रत्येकाच्याच बोलण्यातून काही ना काही शिकण्यासारखे असतेच’. बोलण्यात नेमकेपणा हवा. संघाचे एक जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. मोरोपंत पिंगळे यांच्याबद्दल बोलतांना मा. प्रल्हादजी अभ्यंकर म्हणाले होते, ‘बरेचदा लोक बोलतात खूप, पण सांगत काहीच नाहीत, मोरोपंत बोलले थोडे, पण त्यांनी सांगिपले खूप’. इंग्लंडचे एकेकाळी पंतप्रधान असलेले व चतुरस्त्र व्यक्तीमत्व असलेले श्री. विंस्टन चर्चिल यांना एकदा प्रश्न विचारल्या गेला ‘एखाद्या विषयावर एक तास बोलण्यासाठी किती वेळ पूर्वतयारीला लागेल?’ चर्चिल म्हणाले ‘एक दिवस’. मग विचातल्या गेले ’ पंधरा मिनिटे बोलण्यासाठी?’ चर्चिल म्हणाले ‘पंधरा दिवस’.
काम करतांना प्रचंड चिकाटीची गरज असते. माकडाच्या गोष्टीतल्यासारखे कोय रुजली की नाही ते रोज उकरून पाहिले तर कोय कधीच रुजणार नाही. गर्भाच्या निकोप व सुरळित वाढीसाठी जसा गर्भधारणेचा निश्चित कालावधी असतो, तद्वतच प्रत्येक कार्यकर्त्याच्या, संघटनेच्या विकासासाठी एक Period of gestation’ असतो, तोपर्यंत चिकाटीने प्रतिक्षा करावी लागते. घाई केली तर abortion किंवा premature delivery होण्याची शक्यता असते. वैकुंठ मार्गावर निघालेल्या नारदांना तप करणार्या एका ऋषींनी चित्रगुप्ताकडे चौकशी करायला सांगितले ‘मोक्ष मिळण्यासाठी अजून किती दिवस तप करावे लागेल?’ नारद पुढे गेल्यावर दुसर्याय एका ऋषींनीही चित्रगुप्ताकडे अशीच चौकशी करायला सांगितले. काही दिवसांनी नारद परतले. दुसरे ऋषी त्यांना आधी भेटले, त्यांना ते म्हणाले ‘चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार तुम्हाला अजून चाळीस वर्षे तप करावे लागेल’ हे ऐकून त्या ऋषींनी उद्वेगाने कपाळावर हात मारला. पुढे नारदांना पहिले ऋषी भेटले, त्यांना नारद म्हणाले ‘चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार तुम्हाला अजून, ज्या झाडाखाली तुम्ही तप करीत आहात, त्या झाडाला जितकी पाने आहेत तितकी वर्षे तप करावे लागेल’ हे ऐकून त्या ऋषींनी आनंदाने नाचायला सुरूवात केली, नारदांनी त्यांना आश्चर्याने विचारले ‘निराशेऐवजी तुम्हाला आनंद कसा झाला?’ ते ऋषी म्हणाले ‘झाडाला पाने खूप आहेत, पण असंख्य तर नाहीत. इतक्या वर्षानंतर का होइना पण मोक्ष नक्की मिळणार ही परमानंदाची गोष्ट आहे’ कथेत पुढे असे सांगितले आहे की आनंदाने नाचतानाचताच त्यांना मोक्षप्राप्ती झाली.
स्थायी स्वरुपात काम उभे राहाण्यासाठी कामात सातत्याची गरज असते. श्रीरामकृष्ण परमहंसांना एकदा एकाने प्रश्न विचारला की आपण असे मानतो की गंगेत स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात, पण व्यवहारात असे दिसते की रोज लाखो व्यक्ती गंगेत स्नान करतात पण त्यांच्या जीवनात असे काही आढळत नाही, असे का? श्रीरामकृष्ण त्याला गमतीने म्हणाले, ‘गंगेच्या काठावर मोठे वृक्ष आहेत. जेव्हा लोक स्नानाला जातात तेंव्हा त्यांची पापे या वृक्षांवर जाऊन बसतात, आणि जेंव्हा लोक स्नान करून बाहेर येतात तेंव्हा त्यांची पापे परत त्यांच्या मानगुटीवर बसतात.’ त्यांच्या म्हणण्याचा उद्देश्य हा होता की एकदा पुण्यकर्म केले म्हणजे पाप नष्ट होणार नाही, त्यासाठी सातत्याने पुण्यकर्म करत राहाण्याची गरज आहे. मा. बाबा आमटे यांनी यशस्वी जीवनाची व्याख्या “Continuous creative activity” अशी केली आहे. म्हणजे सातत्याबरोबर रचनात्मकताही पाहिजे. भुकंपग्रस्त भागातील एका मुलाला काही दिवसांसाठी नातेवाइकांकडे पाठवण्यात आले, काही दिवसातच नातेवाइकांचा निरोप आला की मुलाला घेऊन जा, भुकंप इकडे पाठवला तरी चालेल. सातत्याने विध्वंसक कामात गुंतलेल्यांची संख्या कमी नाही, म्हणून सातत्याबरोबरच रचनात्मकताही हवी. पण सातत्याने रचनात्मक ‘चिंतन करणार्यांखची संख्याही कमी नाही, रविंद्र पिंगेनी बोनसाय कादंबरीत Intellectuals म्हणजे काय याचे वर्णन diarrhea of words and constipation of ideas असे केले आहे. म्हणून त्याला कार्यशीलतेची जोड हवी. यासाठी कार्यकर्त्याच्या जीवनात अखंड विधायक कामाचे दर्शन हवे.
प्रत्येकजण संघटनेशी कुठल्यानाकुठल्या निमित्ताने जोडल्या जातो, मग ती व्यक्ती असेल, एखादा कार्यक्रम असेल, एखादा प्रसंग असेल किंवा एखादा विचार असेल. पण हळूहळू कार्यकर्ता संघटनेच्या ध्येयाशी जोडल्या जायला हवा, आणि कामाची सुरूवात जरी कोणीतरी सांगितले म्हणून काम करण्याच्या प्रेरणेपासून झाली असली तरी हळूहळू त्याचे रुपांतर स्वत:हून स्विकारलेले, स्वत:हून करायचे ठरवलेले कार्य यात व्हायला हवे. श्री. विष्णूमहाराज पारनेरकरांनी काम आणि कार्य यातला फरक सांगतांना ‘काम म्हणजे कोणीतरी सांगितले म्हणून करतो ते आणि कार्य म्हणजे स्वत:हून करतो ते’ असे सांगितले आहे. यातून कर्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार संघाच्या सुरुवातिच्या काळात शाखा सुटल्यानंतर त्या वस्तीतल्या एखाद्या प्रतिष्ठिताच्या घरी जात व सोबतच्या कार्यकर्त्यांची ओळख करून देत, ‘हा नववीत शिकणारा बाळ देवरस, आमच्या शाखेचा कार्यवाह आहे’, ती प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टरांना चेष्ठेने म्हणत असे ‘काय डॉक्टर, या शेंबड्या मुलांना घेऊन तुम्ही हिंदूराष्ट्र घडवणार?’ पण डॉक्टरांचा जबर आत्मविश्वास कालांतराने खरा ठरला आणि नववीत शिकणारा बाळ देवरस एक दिवस संघाला राष्ट्रजीवनाच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवणारा संघाचा सर्वोच्च नेता बनला.एकदा कॉंग्रेसचे एक पुढारी संघाच्या कार्यकर्त्याला म्हणाले ‘गेले तीस दिवस तीस गावी टांगा घेऊन फिरतो आहे, पण एक माणूस हाताला लागेल तर शपथ !’ शेजारी उभा असलेला एक बाल स्वयंसेवक म्हणाला ‘लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण तीस दिवस तीस गावी फिरण्यापेक्षा एकाच गावी फिरला असतात तर काम झाले असते.’ मद्रासला संघाच्या कार्यालयात अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर जखमींना भेटायला रुग्णालयात तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता आल्या होत्या. एका जखमी मुलाला भेटतांना त्या म्हणाल्या ‘काही काळजी करू नकोस, तुमच्या संपूर्ण उपचाराची काळजी सरकार घेईल’, तो बाल स्वयंसेवक म्हणाला ‘ आमच्या उपचाराची काळजी घेण्यास संघ समर्थ आहे, तुम्ही अतिरेक्यांचा बदोबस्त करा.’
आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक असले तरी आत्मविश्वासाचे रुपांतर अहंकारात होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. जनसंघाच्या कार्यालयात एकदा संध्याकाळी एका कार्यकर्त्याला दीनदयाळजी उपाध्याय अंगणात शेकोटी पेटवतांना दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला दिसले की दीनदयाळजी त्यांची प्रमाणपत्रे शेकोटीत टाकीत आहेत. अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्याने दीनदयाळजींनी शालेय व महाविद्यालयीन परिक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण केल्या होत्या. त्या कार्यकर्त्याने आश्चर्याने दीनदयाळजींना या शेकोटीचे कारण विचारले, ते शांतपणे म्हणाले ‘माझे जीवन मे आता संघाला समर्पित केले आहे, या प्रमाणपत्रांची आता गरज काय?’ संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री. गुरूजी केरळमध्ये एका वैद्यराजांचे उपचार घेण्यासाठी गेले होते. तिथल्या प्रथेप्रमाणे वैद्यराज त्यांना म्हणाले ‘उपचारांच्या प्रारंभी आपण दोघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करू की या उपचारात आम्हाला यश येऊ दे’ श्रीगुरूजी अतिशय विनम्रपणे त्यांना म्हणाले ‘आजपर्यंत मी परमेश्वराकडे स्वत:साठी काही मागितले नाही, व आताही मागणार नाही’ स्तंभित झालेले वैद्यराज उद्गारले ‘हा पुण्यात्मा आहे’
कार्य करतांना समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या अशा कार्यकर्त्यांचे स्मरण सतत असले पाहिजे. अशा कार्यकर्त्यांचे जीवन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दातून आपल्याला उमजू शकेल...
‘पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे,
बांधु न शकले प्रितीचे वा किर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार’
ज्ञातअज्ञात अशा हजारो महापुरुषांचे आणि क्रांतिकारकांचे आत्मसमर्पण या समाजाच्या उत्थानासाठी झालेले आहे. कल्पवृक्षाखाली बसून केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण कशी होते या प्रश्नाचे उत्तर देतांना वशिष्ठ ऋषी म्हणाले की या वृक्षाखाली बसून असंख्य ऋषीमुनींनी खडतर तपश्चर्या केलेली आहे, त्या तपश्चर्येमुळे या वृक्षात हे सामर्थ्य निर्माण झाले आहे व या वृक्षाचा कल्पवृक्ष झाला आहे. समाजसंघटनेच्या कार्यात अशा शेकडो कार्यकर्त्यांनी अशीच तपश्चर्या केलेली आहे. संघटनेचे काम करतांना हे भान जागे असले म्हणजे कार्यकर्त्यांची पाऊले योग्य दिशेनेच पडतात.
काम करतांना संघटनेचे जीवितकार्य काय व आपल्यासमोरचे लक्ष्य काय याचे अवधान सतत असले पाहिजे. कधीही मैदानावर पाय न ठेवलेल्या एका माणसाने फुटबॉलच्या एका सामन्यात भाग घेतला. सामना संपल्यावर घरी पत्नीला तो सांगत होता ‘तासभर मैदानावर नुसता धावत होतो’ दमलेल्या पतीचे पाय चेपताचेपता पत्नीने कौतुकाने विचारले ‘मग किती गोल मारले तुम्ही?’ ‘गोल ?, अग या तासाभरात माझ्या पायाचा चेंडुला एकदाही स्पर्श झाला नाही’ पती उत्तरला ! कामाच्या धावपळीत आपलेही असे होत नाही ना याची दक्षता घेतली पाहिजे. या समाजाचे, राष्ट्राचे उत्थान हे आमचे लक्ष्य आहे. एक चिमुरडी मुलगी म्हणाली ‘मै उन्नत भारत ने जीना चाहती हू’ आणि अब्दुल कलामांचा भारताचा कायापालट करण्याचा संकल्प गतिमान झाला. आदर्श मानवी जीवनाची उभारणी हे भारतीय जीवनदर्शन आहे. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला, पण भारतीय संस्कृती टिकून आहे. म्हणूनच कवी इक्बाल म्हणतो
‘यूनान मिस्र रोमां सब मिट गए जहासें, कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी’
आज जगालाही याची जाणीव होते आहे. एकेकाळी जगातल्या सगळ्यात धनाढ्य व्यक्तीत गणना होणार्‍या प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा नातू आज हरे रामा हरे कृष्णा म्हणत विचारतो आहे ‘Wealth? Who’s wealth? All the wealth belongs to Lord Krishna.’ रशियाच्या एकेकाळच्या सर्वसत्ताधीश स्टॆलीनची मुलगी स्वेतलाना गंगाकिनारी एक झोपडी बांधून तिथेच अखेरचा श्वास घेण्यात धन्यता मानते. कारण जगातल्या यच्च्ययावत मानवांना त्यांच्या प्रकृतीनुरूप मुक्तीचे मार्ग उपलब्ध करून देणारी भारतीय संस्कृती हेच आज जगाचे आशास्थान आहे.
“ऋचिनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल नाना पथजुषां, नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्ण इव’’
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आपापल्या रुचीप्रमाणे वाटचाल करणारे सर्वजण एकाच सत्त्याकडे जातात.’
आयुर्वेदाची ध्वजा खांद्यावर घेतलेल्या आम्हा सर्वांनाही वैद्यकक्षेत्रात ही भूमिका पार पाडायची आहे.
एतद्देश प्रसूतस्य सकाशाद्अग्रजन्मन:
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्या सर्वमानवा’
’या देशात जन्मलेले आम्ही सर्व आमच्या जीवनातून, पृथ्वीवरच्या सर्व मानवांना ज्ञान देऊ’ आयुर्वेदाचे एक नवे व्यापक, सर्वसमावेशक, आधुनिक, विजिगिषू रूप जगाला दाखवू.
समस्यांनी ग्रासलेल्या या देशात हे सामर्थ्य आहे. हिमाचल प्रदेशात पर्यटन करणार्या श्री. पुजारी यांना बारटोक या छोट्या खेड्यातल्या एका सामान्य चहाच्या टपरीवाल्याने एक कप चहा बिनसाखरेचा बनवला म्हणून साखरेचे पैसे परत दिले. हे या समाजाचे सामर्थ्य आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विध्वंसाचा आगडोंब उसळलेल्या पंजाब मध्ये विक्रमी धान्योत्पादन घेणारा शेतकरी हे या देशाचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या आधारावरच नव्या भारताचे स्वप्न साकार होणार आहे. If you can dream it, you can do it.
हे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता गाभार्‍या तील भारतमातेची प्रतिमा उजळवणारा नंदादीप बनला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा ठरवावी लागेल. ‘Most people are like falling leaf that drifts, turns, flutters and fall to the ground. Few others are like stars which travel a definite path. No wind reaches them. They have within themselves the path and the guide.’ Herman Hess in “Siddhartha”
आज संकटांनी वेढलेली भारतमाता तिच्या पुत्रांच्या पुरुषार्थाला आवाहन करते आहे, कवी म्हणतो
“शून्य तटोसे सर टकराकर, पूछ रही गंगाकी धारा,
सगरसुतोसेभी बढकर मृत, आज हुवा क्या भारत सारा.
यमुना रोती कहा कृष्ण है, शरयु कहती कहा राम है,
व्यथित गंडकी खोज रही है, चन्द्रगुप्त के धाम कहा है.
अर्जुन का गॉंडीव किधर है, कहा भीम की गदा खो गई,
किस कोने मे पॉंचजन्य है, कहा भीष्म की शक्ति सो गई.
कोटीकोटी पुत्रोकी माता, अब भी पीडित-अपमानित है,
जो जननि का दुख न मिटाये, उन पुत्रोपर लानत है.”
पण कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्विकारले आहे, ते म्हणतात
“आखोमे वैभव के सपने, पगमे तुफानो की गति है,
राष्ट्र सिंधुका ज्वार न रुकता, आये जिसजिसकी हिम्मत हो.”

*** ** *

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: विविध आयाम व कार्यपद्धती

आयुर्वेद व्यासपीठ: विविध आयाम व कार्यपद्धती


संस्थात्मक कामाच्या दृष्टीने पदाधिकार्यांसच्या दायित्वाचे विवरण घटनेत असले तरीही संघटनेच्या संदर्भात, निरोगी वाटचालीच्या दृष्टीने निश्चित कार्यपद्धतीचा अंगिकार करणे उचित ठरावे. सखोल चिंतन, नेटके नियोजन व कार्यक्रमांची व्यवस्थित आखणी यासाठी कामाचे विविध पैलू, कार्यकारी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटून घ्यावे, या कार्यकर्त्यांनी, संस्थापक/आजीव/सहयोगी/निमंत्रित सभासदांमधील अन्य काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या, त्या विषयाचा अभ्यासगट तयार करावा व त्या विषयासंदर्भात ढोबळ आराखडा कार्यकारी मंडळासमोर विचारार्थ ठेवावा, मंडळाने सविस्तर सामुहिक चिंतनानंतर त्यावर निर्णय घ्यावा. ठरलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा संबंधित कार्यकर्त्यांनी अभ्यासगटाच्या मदतीने करावा, आकस्मिक निर्णयप्रसंगी प्रमुख पदाधिकार्यांीनी त्या विषयाशी संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे, व लवकरात लवकर त्याची कल्पना कार्यकारी मंडाळाला द्यावी.

कार्यकारी मंडळासमोरील काही विषय
1.आजीव सदस्यांची नियुक्ती
2.निमंत्रित सदस्यांची यादी:अ) आयुर्वेद विश्वातील जेष्ठ व सन्माननीय व्यक्तींमधून
आ) संघप्रेरीत वैद्यकीय संघटना, संस्था व रुग्णालयांचे प्रतिनिधी उदा: वैद्यकीय
विद्यार्थी परिषद, एनएमओ, ग्राहक पंचायत वैद्यकीय विभाग, रक्तपेढ्या-
रुग्णालये व वैद्यकीय सेवा प्रकल्पांचे प्रतिनिधी
इ) वैद्यकीय पदवीधर नसलेल्या आयुर्वेद विश्वातील व्यक्तींमधून उदा: औषधी
निर्माते, संस्थाचालक, वनौषधींची लागवड करणारे, वनस्पतीशास्त्रज्ञ, प्रशासन
सेवेतील किंवा सेवानिवृत्त व्यक्ती

विविध आयाम व त्यानुसार विषयसूची

1.संघटन : संपर्क यंत्रणा, प्रवासाची योजना, विभाग, जिल्हा, नगर स्तरावर संघटनात्मक रचना. प्रांत, विभाग, जिल्हा स्तरावर
बैठका व अभ्यासवर्गांची योजना.
2.आर्थिक व्यवहार : प्रांत, विभाग व जिल्हा स्तरावर विविध स्वरूपातील निधीसंकलनासाठी निश्चित
धोरण.संस्थात्मक व संघटनात्मक कामासाठी झालेल्या जमाखर्चाचे विवरण नियमितपणे
प्रांताकडे पाठवणे.स्थानिक कर्यक्रम, उपक्रमांसाठी झालेल्या जमाखर्चाचे शेष राशीसह काटेकोर विवरण
प्रांताकडे पाठवणे.
व्यासपिठाच्या नावावर होणार्‍या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद प्रांत कार्यालयात
असणे आवश्यक.प्रांत, विभाग व जिल्हा स्तरावर जमाखर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
3.पदवीधर व व्यावसायिक सदस्य : पूर्ण पत्त्यांसह अद्ययावत सूची जिल्हा, विभाग व प्रांत
स्तरावर. व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी उपक्रम- व्याख्याने, परिसंवाद,
कार्यशाळा, शास्त्रचर्चासत्रे (Clinical meetings)
व्यावसायिक समस्या निराकरणासाठी प्रयत्न.ग्राहक संरक्षण कायद्याबाबत
मार्गदर्शन. शासकीय सेवेत उपलब्ध संधींची पूर्तता.
शासकीय सेवेतील पदवीधरांची सूची, संपर्क यंत्रणा, स्वतंत्र
उपक्रम.शासकीय सेवेतील पदवीधरांच्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न.
4.महिला वैद्य : पूर्ण पत्त्यांसह अद्ययावत सूची जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रम
5.विद्यार्थी : महाविद्यालयांची सूची, विद्यापीठ प्रमुख व महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती.
जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन:प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत.
इंटर्नीजसाठी परिसंवाद, कार्यशाळा, पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शन.अनुभवी वैद्यांकडे प्रशिक्षणाची
यो
जना.वैद्यकीय सेवाप्रकल्पांना भेटीसाठी सहलींचे आयोजन.विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न,
आंदोलन.शिक्षणानंतर पूर्णवेळ काम करण्याचे आवाहन.
6.अध्यापक : जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
समस्या निराकरणासाठी प्रयत्न, आंदोलन.
7.संस्था व संस्थाचालक : नियमित संपर्काची योजना, प्रासंगिक स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
8.सामाजिक उपक्रम: शिबिर योजना- व्याधींनुसार चिकित्सा शिबिरे व आरोग्यशिक्षण शिबिरे
शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद व तत्सम उपक्रम
सेवाप्रकल्प: उपेक्षित घटकांसाठी सेवाप्रकल्प आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सहाय्य राष्ट्रीय आरोग्यमोहिमांमध्ये सहभाग.
9. संशोधन: विविध आयुर्वेदीय संस्था व पदवीधरांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे.संशोधन संस्थांमध्ये समन्वय व
सुसुत्रता आणणे.शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेले संशोधन आयुर्वेदेतर वैद्यकीय समुदायासमोर व समाजासमोर
प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी उपक्रम योजणे.
समन्वय: अ) संघप्रेरीत वैद्यकीय संघटना : अशा संस्था, संघटना, रुग्णालये यांच्या महत्वाच्या प्रत्येक
वैद्यकीय घडामोडीत व्यासपिठाचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग व अशा प्रसंगी
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यासपिठाच्या भूमिकेची मांडणी
आ) आयुर्वेदाच्या क्षेत्रातील अन्य संस्था, संघटना, चळवळी, आंदोलने, उपक्रम: यामधील सक्रीय घटकांशी
संपर्क, व्यासपिठच्या ध्येयधोरणांशी त्यांचा परिचय व क्रमश: त्यांना व्यासपिठाच्या भूमिकेने
प्रभावित करणे. प्रांतीय, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत
व्यासपिठाचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग व अशा शक्य त्या प्रत्येक प्रसंगी
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यासपिठाच्या भूमिकेची मांडणी.
इ) आयुर्वेदेतर वैद्यकीय समुदाय: विविध स्तरांवर क्रमश: संपर्काची व त्यांना व्यासपिठाच्या ध्येयधोरणांशी
परिचित करण्याची व व्यासपिठाच्या भूमिकेने प्रभावित करण्याची दीर्घकालीन योजना व त्या
दृष्टीने स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
***
दि. 30.11.2000 (व्यासपिठाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गठित झालेल्या पहिल्या कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकप्रसंगी विचारार्थ तयार केलेले टिपण.)

आयुर्वेद व्यासपीठ: संकल्पना व उद्दिष्टे

आयुर्वेद व्यासपीठ: संकल्पना व उद्दिष्टे

1. विद्यार्थ्यांपासून संस्थाचालकांपर्यंत, औषधीवनस्पतींची लागवड करणार्‍यांपासून कारखानदारांपर्यंत व वैद्यक व्यावसायिकांपासून शासकीय यंत्रणेपर्यंत आयुर्वेदाशी संबंधित सर्व घटकांना एका सुत्रात गुंफणारे ‘व्यापक संघटन’.
2. शालेय विद्यार्थ्यांपासून जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचवणारा व दैनंदीन जीवनात आयुर्वेद रुजवणारा प्रचार, प्रसार व लोकशिक्षणाचा ‘व्यापक उपक्रम’.
3. आयुर्वेदाच्या अंगभूत सामर्थ्याची प्रचिती जागवून आयुर्वेद व्यावसायिकांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण करण्याचा ‘प्रामाणिक प्रयत्न’.
4. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील विभिन्न समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने, निस्वार्थपणे व संघटितपणे संघर्ष करणारी ‘प्रभावी चळवळ’.
5. आयुर्वेदाच्या मूळ अधिष्ठानाचे जतन व संरक्षण करतांनाच माहिती विस्फोटाच्या या कालखंडातील अद्ययावत ज्ञान व नवनवीन आव्हाने समर्थपणे पेलणार्या नव्या आयुर्वेदीय शिक्षणपद्धतीच्या विकासाला चालना देणारे ‘अभ्यासकेंद्र’
6. आरोग्याच्या क्षेत्रातील आजची आव्हाने व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्या यांच्या निराकरणासाठी प्राचीन संहिता ग्रंथातील ज्ञान, हजारो वर्षांच्या वैद्यपरंपरेचे संचित व आधुनिक वैद्यकतंत्राने विस्तारलेली क्षितिजे या सर्वांच्या सुसुत्र संयोजनातून आयुर्वेदातील संशोधनाला योग्य दिशा व गती देणारे ‘शास्त्रीय विचारमंथन’.
7. वैद्यकीय क्षेत्रातून लुप्त होत असलेला सेवाभाव व नैतिकता पुनश्च प्रस्थापित करून व्यवसायाबरोबरच समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत राहाण्याची प्रेरणा देणारे एक ‘संस्कार केंद्र’
8. आयुर्वेदाच्या क्षेत्रात आज देशविदेशात चालणार्‍या अनेक संस्था, संघटना, चळवळी व उपक्रम यांना निखळ स्नेहाने व आयुर्वेद उत्थानाच्या विशुद्ध प्रेरणेने एकत्र आणून समान्वय साधणारे ‘व्यापक व्यासपीठ’
***

आयुर्वेद व्यासपीठ: दिशा, धोरण आणि उपक्रम

आयुर्वेद व्यासपीठ: दिशा, धोरण आणि उपक्रम

1925 साली संघाच्या रुपाने सुरू झालेल्या राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला आज विराट स्वरूप प्राप्त झाले आहे. या पुनरुत्थानाच्या प्रक्रियेचे स्वरूप आज विद्यमान असलेल्या समस्या व आव्हानांचे हिंदुत्वाच्या आधारावर निराकरण करून, हिंदू जीवनदर्शनाला अनुरूप आदर्श समाजजीवनाची निर्मिती हे आहे. हिंदू जीवन दर्शन असे मानते की जीवनाचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीत विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची त्या व्यक्तिच्या क्षमतेनुसार प्राप्ती करणे हे होय. या पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे हे त्या व्यक्तीच्या जीवनाचे लक्ष्य, तर त्या व्यक्तीच्या प्रयत्नांना पोषक वातावरण निर्माण करणॆ हे समाजाचे कर्तव्य. या अधिष्ठानावर आधारित राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे प्रयत्न संघप्रेरीत काम करणार्याव संघटनांच्या द्वारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आज सुरू आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात हे प्रयत्न सुरू आहेत. असेच प्रयत्न वैद्यकीय क्षेत्रातही सुरू आहेत. या प्रयत्नातुनच आयुर्वेद व्यासपिठाचा जन्म झाला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना कार्यकर्त्यांना हिंदू जीवनदर्शनातून उत्पन्न झालेले आयुर्वेद व योगाचे अधिष्ठान उपलब्ध आहे. स्वाभाविकच वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाच्या कार्यात आयुर्वेद व्यासपीठ व म्हणून व्यासपिठाचे कार्यकर्ते अग्रभागी असतील. वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना आयुर्वेद व योगाच्या अधिष्ठानावर ठाम राहून पण उपलब्ध माहिती, प्रगती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून या क्षेत्रातील आजच्या सर्व आव्हानांना तोंड देत नवी रचना उभी करावी लागेल. या जाणिवेतुनच कामाच्या धोरण व उपक्रमांचा विचार करावा लागेल.

नव्या संदर्भात तत्वचिंतन
व्यासपिठाच्या कामाचा विचार करतांना या कामाच्या विविध आयामांचा विचार करावा लागेल. आजच्या काळातही आयुर्वेदाचे अधिष्ठान उपयुक्त, परिणामकारक व कालोचित आहे हे वैद्यकविश्वाच्या आजच्या स्थितीच्या पार्श्वभुमीवर व आजच्या समस्यांच्या संदर्भात प्रभावीपणे व शास्त्रशुद्ध रितीने मांडावे लागेल. एक समग्र, एकात्म, तर्कशुद्ध शास्त्र, एक परिणामकारक, आजच्या सर्वप्रकारच्या वैद्यकीय समस्यांना हाताळण्यास सक्षम व यशस्वी चिकित्सापद्धती व निरामय जीवन जगण्यासाठी एक संपूर्ण जीवनपद्धती अशा विविध प्रकारे ही मांडणी करावी लागेल.

संघटनात्मक उभारणी
वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना संघटना उभारणीसाठी व ही मांडणी वैद्यकविश्वापर्यंत व समाजासमोर नेण्यासाठी संपर्क व संघटना बांधणीचा अग्रक्रम ठरवावा लागेल. आयुर्वेद पदवीधरातील आज जे निष्ठेने आयुर्वेदाचा अंगिकार करतात त्यांच्यापासून प्रारंभ करून क्रमश: आज निष्ठेने आयुर्वेदाचा अंगिकार करत नसले तरी आयुर्वेदाचे पदवीधर असलेले अन्य चिकित्सक, आयुर्वेदाची आवड व आयुर्वेदाचा अभ्यास असलेले अन्य वैद्यकप्रणालींचे वैद्यकव्यवसायीक, संघसंबंधित अन्य वैद्यकप्रणालींचे वैद्यकव्यवसायीक व अंतिमत: सर्व वैद्यकव्यवसायीक आज ना उद्या व्यासपिठाच्या कक्षेत आणावे लागतील.

प्रचार आणि प्रसार
एकीकडे वैद्यकविश्वापर्यंत आयुर्वेद पोहोचवतांनाच, दुसरीकडे संपूर्ण समाजासमोरही आयुर्वेदाला नेण्यासाठी प्रचार आणि प्रसाराचे विविध उपक्रम राबवावे लागतील. आहार विहार, दिनचर्या, ऋतुचर्या इ. विषयांवर व्याख्याने, लेख, आकाशवाणी व दूरदर्शनवर सादरीकरण आदि माध्यमातून समाजात आयुर्वेद पोहोचवावा लागेल, रुजवावा लागेल. सर्वसामान्य रोगनिदान शिबिरे व विविध व्याधीनुसार शिबिरांच्या माध्यमातून एक प्रभावी चिकित्सापद्धती म्हणून आयुर्वेदाला व या चिकित्सापद्धतिचा आजचा आधारस्तंभ म्हणून व्यासपिठाला प्रतिष्ठापित करावे लागेल.

शिक्षण
शिक्षणक्षेत्राच्या संदर्भात एकीकडे या क्षेत्रातील अध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक अशा विविध घटकांना व्यासपिठाशी जोडण्यासाठी, त्या त्या स्तरावर रचना करण्याच्या कामाबरोबरच या क्षेत्रातील आजच्या समस्या सोडवण्यासाठी विधायक व संघर्षात्मक प्रयत्न करावे लागतील, तर दुसरीकडे शिक्षणपद्धतीतले दोष दूर करून आजच्या सर्व वैद्यकीय आव्हानांना पेलण्यासाठी समर्थ असा स्नातक घडवण्यासाठी सुयोग्य अशा शिक्षणपद्धतीच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे लागतील. आयुर्वेदेतर चिकित्सा प्रणालींच्या अभ्यासक्रमातही आयुर्वेदाचा योग्य त्या पद्धतीने समावेष व्हावा म्हणून प्रयत्न करावे लागतील.

स्वास्थ्यसेवायंत्रणा
सार्वजनिक स्वास्थ्यसेवा यंत्रणेच्या (Public health services) संदर्भात, आज या क्षेत्रात असलेल्या आयुर्वेदीय घटकांना व्यासपिठाशी जोडणे, या यंत्रणेत व या यंत्रणेद्वारा राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात (National health programmes) आयुर्वेदाला योग्य ते स्थान मिळवून देणे व क्रमश: या संपूर्ण क्षेत्रालाच आयुर्वेदाच्या प्रभावाखाली आणण्याच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

संशोधन
संशोधनाच्या संदर्भात, प्रत्यक्ष संशोधन करण्यासाठी लागणारी संरचना (Infrastructure) व्यासपिठाजवळ नसल्याने – व असणे आजतरी अपेक्षित नसल्याने – व्यासपीठ म्हणून संशोधन करणे शक्य, उचित व आवश्यकही नाही. पण आवश्यक व योग्य त्या विषयांवर संशोधन होण्यासाठी अभासकांना प्रवृत्त करणे, उपयुक्त असे झालेले संशोधन आवश्यकतेनुसार व योग्यतेनुसार आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसमोर, अभ्यासकांसमोर, अन्य वैद्यकव्यावसायिकांसमोर व समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमात आयुर्वेदाला शेवटचे स्थान असते. अशा विद्यार्थ्यांसमोर हे संशोधन योग्य त्या पद्धतीने आले तर हा प्राधान्यक्रम बदलू शकतो व गुणी विद्यार्थी या क्षेत्राला उपलब्ध होऊ शकतात.

सेवा
सेवेच्या संदर्भात आज विभिन्न संस्था संघटनांद्वारा सुरू असलेल्या सेवा प्रकल्पात व्यासपिठाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग, त्या प्रकल्पात आयुर्वेदाचा अंतर्भाव व पूर्णपणे आयुर्वेदावर आधारित नव्या सेवाप्रकल्पांचा प्रारंभ या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

समन्वय
हिंदू जीवनदर्शनातून उत्पन्न झालेले आयुर्वेद व योगाचे अधिष्ठान हे वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचा आधार असल्याने पुनर्निर्माणाच्या कार्यात आयुर्वेद व्यासपीठ व म्हणून व्यासपिठाचे कार्यकर्ते अग्रभागी असले पाहिजे, इतकेच नव्हे तर आज ना उद्या त्यांनीच या चळवळीतील सर्व अन्य संघटनांमध्ये समन्वय निर्माण केला पाहिजे. व्यासपिठाच्या पुर्वीपासून सुरू असलेल्या विश्व आयुर्वेद परिषद, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायजेशन (NMO) सारख्या संघटना, आज कार्यरत असलेल्या आरोग्यभारती, वैद्यकीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना व वैद्यकीय सेवा प्रकल्प ज्यांच्या कामाचे महत्वपूर्ण अंग आहे अशा सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, दीनदयाळ शोध संस्थान, भारत विकास परिषद अशा संघटनाचे कार्य वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाच्या संदर्भात उपयुक्त, अर्थपूर्ण व फलदायी व्हायचे असेल तर त्यांच्या कामाला आयुर्वेदाचा परिसस्पर्श झाला पाहिजे व ही जवाबदारी आयुर्वेद व्यासपिठालाच पार पाडावी लागेल.
********
(3.10.99 ला मोतीबाग पुणे येथे झालेल्या व्यासपिठाच्या बैठकीत मांडलेल्या विषयाचे प्रारूप)

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

आरक्षण प्रकरणी सामंजस्यपूर्ण चर्चेची आवश्यकता

आरक्षण प्रकरणी सामंजस्यपूर्ण चर्चेची आवश्यकता
आयुर्वेद व्यासपिठाचे आवाहन

आयुर्वेद व्यासपीठ हे आयुर्वेदाशी संबंधित सर्व घटकांना संघटित करून वैद्यक क्षेत्रातील आजच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक परिवर्तन घडवून आणणारे संगठन आहे. त्याबरोबरच आयुर्वेद व्यासपीठ एकसंध व समरस समाजनिर्मितीसाठीही प्रतिबद्ध आहे.
आज आरक्षणाच्या प्रश्नावरून जो संघर्ष निर्माण झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे असे व्यासपिठाचे मत आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत समाजातील दुर्बल घटकांचा विकास हा अग्रक्रमाचा विषय असला पाहिजे किंबहुना समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत लवकरात लवकर कोणीही दुर्बल किंवा मागासलेला राहाणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याचेच ध्येय सगळयांच्या समोर असले पाहिजे अशी व्यासपिठाची धारणा आहे. म्हणूनच जोपर्यंत समाजात वंचित दुर्बल घटक शिल्लक आहेत तोपर्यंत त्यांच्या विकासासाठी आरक्षण असलेच पाहिजे ही आयुर्वेद व्यासपीठाची भूमिका आहे.
परंतु या भूमिकेचा पाठपुरावा करतांनाच आरक्षणाच्या प्रावधानामागचे उद्देश साध्य होतील व खरोखरच दुर्बल किंवा मागासलेल्या समाज घटकांनाच त्याचा लाभ होईल अशाच रितीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे आयुर्वेद व्यासपीठाला चाटते. खरे वंचित दूर राहून तथाकथित मागासलेल्या जातीतील प्रगत व विकसित व्यक्तीच जर आरक्षणाचा लाभ घेत असतील तर तो आरक्षणाच्या धोरणाचा पराभव मानला पाहिजे. आज आरक्षणविरोधी वातावरण निर्माण होण्यामागे हेही एक कारण आहे हे समजून घेतले पाहिजे.
कुठल्याही समस्येचा राजकीय लाभासाठी वापर करण्याची जी घातक परंपरा निर्माण झाली आहे तिने आरक्षणाची समस्या चिघळवली आहे. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी समाजात विद्वेष निर्माण करणारे बेजवाबदार राजकारणी या संघर्षामागचे खरे गुन्हेगार आहेत. आरक्षणाचे समर्थन व विरोध करणार्‍या राजकारण्यांना रस केवळ मतपेटीच्या राजकारणात आहे हे ओळखून या आंदोलनात उतरणार्‍यांनी आपण स्वार्थांध राजकारण्यांच्या हातातले बाहुले बनणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
आज असंख्य भीषण समस्यांनी ग्रस्त समाजाला विद्वेषाच्या खाईत लोटणार्‍या संघर्षापासून वाचवण्यासाठी आरक्षणासारखे विषय राजकारण्यांच्या पकडीतून सोडवून निकोप व एकसंध एकरस समाजनिर्मितीसाठी झटणार्‍या सर्व संघटना व चळवळींनी परस्परातले पूर्वग्रह व अभिनिवेष बाजूला ठेवून त्यावर सामंजस्यपूर्ण वातावरणात सर्वंकष चर्चा करण्याची गरज आहे.
आज हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व न्यायालयाने जी समतोल भूमिका या संदर्भात घेतली आहे तिचा सर्वांनीच आदर करून सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे व सामंजस्यपूर्ण चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे असे सर्व संबंधित घटकांना व्यासपिठाचे कळकळीचे आवाहन आहे.

अभ्यासवर्गासाठी प्रारूप

अभ्यासवर्गासाठी प्रारूप
दोन दिवसांच्या अभ्यासवर्गात पहिला दिवस प्रामुख्याने कार्यक्रम व तपशिलासाठी, तर दुसरा दिवस ध्येयधोरणे व दिशादर्शनासाठी असावा. दोन्ही दिवशी एक गटश: सत्र व एक मुक्तचिंतनाचे सत्र असावे.
पहिला दिवस
1. आयुर्वेदासाठी कर्यरत संघटना व चळवळींचा इतिहास, आजच्या आव्हानांना पेलण्याची त्यांची क्षमता.
2. आयुर्वेद व्यासपिठाची आवश्यकता, भूमिका, संकल्पना, उद्दिष्टे व वाटचाल.
3. जिल्हाश: परिचय व निवेदने .
4. आदर्श नियोजन – शिबिर, कार्यशाळा, परिसंवाद, शास्त्रचर्चासत्र, संशोधन प्रकल्प.
5. श्रेणीश: बैठका – व्यावसायिक, विद्यार्थी, प्राध्यापक, स्त्रीवैद्य. पदाधिकार्यां च्या बैठका – अध्यक्ष/उपाध्यक्ष, कार्यवाह/सहकार्यवाह, कोषाध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, महाविद्यालय
प्रमुख
6. मुक्तचिंतन: व्यासपिठाच्या कार्यवाढीसाठी विविध उपक्रम.

दुसरा दिवस

1. भारताचा सांस्कृतिक वारसा व आजच्या समस्यांची उत्तरे, विश्वगुरू भारत (एक गुलाम देश ते महासत्ता)
2. शास्त्रचर्चासत्र.
3. मुक्तचिंतन: वैद्यकक्षेत्रातील/आयुर्वेदासमोरची आजची आव्हाने व त्यांचे निराकरण.
4. कामाचा आधार कार्यकर्ता: कार्यकर्त्याचा विकास.
5. जिल्हाश: बैठका: कार्यवाढीचा संकल्प, आगामी कार्यक्रम.
6. समारोप- यशाने दुमदुमवू त्रिभुवने.
***
 शक्य त्या सर्व सत्रांची (1,2,4/1ला व 2रा दिवस) टिपणे वर्गापूर्वी एकत्र करून समारोपानंतर वितरण.
 पहिल्या दिवशीच्या सत्र 4 मध्ये एकेका कार्यकर्त्याने एकेका उपक्रमाच्या नियोजनाचे प्रारूप मांडावे.
 पहिल्या दिवस अखेरीस कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी किमान कार्यक्रम निश्चित करून दुसर्यान दिवशीच्या 4 थ्या सत्राच्या शेवटी त्याची घोषणा, जिल्हाश: बैठकीत त्याची योजना व समारोपाच्या सत्रारंभी त्याचे निवेदन.
 पहिल्या दिवशी पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात उदघाटन, संध्याकाळी खेळ/भ्रमण, रात्री विविधगुणदर्शन. दुसर्‍या दिवशी पहाटे योगासने.